सकाळ झाली पण सरिता तिथेच बसून होती, अजून रडत होती. उदास बसली होती.
पुन्हा तोच आवाज आला आणि खांद्याला स्पर्श झाला
ए राणी, अशी उदास नाही चांगली वाटत तू .. तुला आवडत नाही का मी? मी आल्यावर तर खुश राहा.
सरिता ने पुन्हा त्याला घट्ट मिठी मारली. आता ती त्याला सोडायला तयार नव्हती. एकाच प्रश्न
कुठे गेला होतास तू मला सोडून?
ए राणी, इतकं कसं प्रेम करतेस गं माझ्यावर?
मी तुझाच आहे, कुठे नाही जात तुला सोडून. चल लवकर तयार हो आणि जा कामावर
सरिता आता शांत झाली आणि कामावर गेली. आता तिला फार हायसं वाटत होतं. तिला जे हवं ते मिळालं होतं. सगळं कसं अलबेल चाललं होतं.
दिवसांमागुन रात्री उलटल्या…
ते दोघे रोज भेटू लागले, तिने पाहिलेलं प्रत्येक स्वप्न पूर्ण झालं होतं, सत्यात उतरलं होतं. दोघांमध्ये कोणीही तिसरा व्यक्ती नव्हता. फक्त दोघेच. त्यांच्या वेगळ्या विश्वात. इतक्या दिवसात कधीच त्यांनी एकमेकांचा भूतकाळ जाणून घेतला नाही. भविष्य देखील त्यांनी असली धर्तीवर रंगवले नव्हते. सगळं स्वप्नासारखं सुंदर. हो हेच तर हवं होतं सरिताला.
त्याच्या सोबत प्रत्येक क्षण ती जगत होती, अनुभवत होती. त्यांच्यातली जवळीक वाढली. त्यांना मर्यादाही उरल्या नव्हत्या. ते दोघे ज्या विश्वात होते त्याला वास्तवाचं भान अजिबात नव्हतं.
सरिता च्या नाराजीवर नेहमी एक उत्तर असायचं त्याच्याकडे
सगळं नीट होईन. तुझ्या मनासारखं होईन. माझं वचन आहे
कधी बॉस शी पटत नव्हते तर बॉस ची जागाच तिला मिळाली, पैसे भरभरून आले, पदोन्नती, आर्थिक सुबत्ता, वाढत अहंम. तिचे ज्याने मन दुखावले त्याची अवस्था बिकट होत असे, तो माफी मागायला येत असे. तिला कोणीही उलट बोलत नसे. कोणताही सवाल केलेला तिला चालत नव्हता. ती जिथे जात असे तिथे लोकं तिच्या दिमतीत हाज़िर होत असे. बरेच लोक तिला न ओळखतानाही घाबरू लागले होते.
पण हळूहळू तिचे लोकं तिच्यापासून दूर होऊ लागले. अर्थातच सरिताला काही वाईट वाटत नव्हते ह्या गोष्टीचे.
अनेक महिने उलटले आणि तो बोलला
आपण लग्न करूयात?
हो ….
सरिता खूप खुश झाली. तिचे सगळे स्वप्न प्रत्यक्षात उतरली होती